जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे ”भारतीय संविधान दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले कि, संविधानाप्रती आपले प्रेम व बांधिलकी व्यक्त करण्याचा तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जागविण्याचा हा दिवस आहे. ‘भारतीय संविधान हा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून लाभलेला सर्वात मौल्यवान दागिना असून संविधानाच्या मातृरूपी छायेखाली सर्व भारतीयांचे जीवन सुकर झाले आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाप्रती आदर आणि निष्ठा ठेऊन वागले पाहिजे. घटनेतील तत्वाप्रमाणे वागलो तर निश्चितच देशाचा व्यवहार चोख होईल. राज्यघटना ही एक जिवंत दस्ताऐवज असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या त्रिसूत्रीवर आधारलेला व काळाबरोबर बदलण्याची क्षमता असलेला सर्वश्रेष्ठ कायदा म्हणजे संविधान हे सांगतानाच त्यांनी संविधानाच्या निर्मितीप्रक्रियेचा आढावा घेतला.
यावेळी पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांनी संविधानाप्रती असलेली आपापली मते व्यक्त केली. तसेच २६/११ च्या मुंबई दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीर पुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमांसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका तस्लीम रंगरेज यांनी केले.