भाजपची व्यूहनीती वापरुन शिंदेंचा नवा डाव !

भाजप जागांवर घाव घालण्याची तयारी,महायुतीत वाद होण्याची चिन्हे

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात एकनाथ शिंदेंना त्यांच्या हक्काच्या जागा मिळवताना संघर्ष करावा लागला. 2019 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या जागांवर भाजपने दावा सांगत शिंदेंना अडचणीत आणले. अखेर शिंदेंना महत्प्रयासाने 15 जागा मिळाल्या. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात वापरलेली व्यूहनीती आता शिंदेसेनेने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वापरण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागांवर शिंदेसेना दावा सांगणार आहे. तसा निर्धार शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुलेंनी व्यक्त केला. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांची मागणी आमचा पक्ष जागावाटपात करेल, असे चौगुले म्हणाले. ऐरोली आणि बेलापूरमध्ये भाजपचे आमदार आहेत. गणेश नाईक ऐरोलीचे, तर मंदा म्हात्रे बेलापूरचे प्रतिनिधीत्व करतात. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. म्हात्रे 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या. तर नाईक 2019 मध्ये भाजपकडून निवडून आले. विशेष म्हणजे म्हात्रे आणि नाईक एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्यात असलेले विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रृत आहे.

शिंदेसेनेने बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघांवर दावा सांगितल्याने महायुती खटके उडण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीचे जागावाटप सुरु असताना शिंदेंचे खासदार असलेल्या अनेक जागांवर भाजपने दावा सांगितला होता. त्यामुळे शिंदेंची गोची आहे. त्यांना हक्काच्या जागा पदरात पाडून घेताना बरीच कसरत करावी लागली. भाजपने सर्व्हेंच्या अहवालांचा संदर्भ देत शिंदेंना जेरीस आणले. अखेर महत्प्रयासाने शिंदेसेनेला 15 जागा मिळाल्या. लोकसभेत शिंदेसेनेची कामगिरी भाजपपेक्षा चांगली झाली. राज्यात सर्वाधिक 28 जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या. तर शिंदेसेनेने 15 जागा लढवत 7 जागा निवडून आल्या. शिंदेंचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा वरचढ राहिला. यानंतर शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी लोकसभेच्या जागावाटपावेळी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देत भाजपला लक्ष्य केले. ‘भाजपने स्वत:च्या जागा एका फटक्यात जाहीर केल्या, त्याच पद्धतीने शिंदेसेनेला एकाच वेळी सगळे उमेदवार जाहीर करु दिले असते, तर आमच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या. आमच्या जागांवर दावे केले गेले. त्यामुळे जागावाटपास विलंब झाला. सर्व्हेंमुळे उमेदवार बदलले गेले. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला. कारण जागाच उशिरा सुटल्या,’ अशा शब्दांत त्यांनी भाजपला रडारवर घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.