दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशभरात मान्सूनचा जोर चांगलाच सुरु आहे. मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये महापूर आला आहे. हिमाचल प्रदेशात ४० वर्षे जुना असलेला पूल वाहून गेला आहे. नवी दिल्लीत पावसाचा ४० वर्षांचा विक्रम तुटला आहे. पावसामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश, आणि चंदिगढमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने जमू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दिल्लीत पावसाचा रेकॉर्ड ब्रेक
दिल्लीत मुसळधार पावसाचा ४१ वर्षांचा विक्रम तुटला आहे. यापूर्वी १९८२ मध्ये सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर २०२४ मध्ये २४ तासात आता १५३ मिमी पाऊस झाला आहे. आता पुढील २४ तासांत मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम,पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, मणिपुर, त्रिपुरा, ओडिशा, गुजरात, गोवा, आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हिमाचलमध्ये मोठे नुकसान
हिमाचल प्रदेशात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कुल्लू, मनालीमधील अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. मनालीहून अटल टनल ते रोहतांग दरम्यान जाणारा रस्ता बंद झाला आहे. मुसळधार पावसाने सर्वत्र नुकसान झाले आहे.