बापरे.. खळ्यातून १२ बकऱ्या कारमध्ये कोंबून पळवल्या 

पाठलाग करून चोरटे पसार 

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

 

शेतकऱ्याच्या खळ्यातून १२ बकऱ्या कारमध्ये घालून अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना जळगाव तालुक्यातील पाथरी येथे शुक्रवारी २८ जून रोजी मध्यरात्री १ वाजता घडली आहे. शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडू लोटन धनगर (वय ५०, रा. पाथरी ता. जळगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गावातील बसस्टॅन्ड जवळ त्यांचे घर आहे. तेथे एका खळ्यात त्यांच्या ६ मोठ्या व ६ लहान अशा १२ बकऱ्या, त्यात ३ बोकड असे बांधून ठेवण्यात आल्या होत्या. शुक्रवारी २८ जून रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्यांना बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी जागी होऊन पाहिले तर एका लाल रंगाच्या इंडिका कारमध्ये अज्ञात चोरटे बकऱ्या कोंबत असल्याचे त्यांना दिसले. ते पाहून त्यांनी शेजारील उत्तम महाजन यांना आवाज दिला. तसेच दोघांनी इंडिका कारला अडविण्याचा प्रयत्न केला.

मात्र दोघांनाही कट मारून इंडिका कार सामनेर, नांद्रा, पाचोरा मार्गे भरधाव निघून गेली. नंतर पशुपालक दगडू धनगर व उत्तम महाजन यांनी दुचाकीवर कार शोधण्याचा पाचोरापर्यंत प्रयत्न केला. मात्र काही फायदा झाला नाही.

दरम्यान त्यांनी शुक्रवारी २८ जून रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.