अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिमंडळाच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह.!

0

मुंबई येथे पत्रकार परिषदेत पुराव्यांसह : आरोप कठोर कारवाईची मागणी

(मुंबई विशेष प्रतिनिधी)

सामान्यपणे राजकारणात कोणत्या वेळी काय होईल हे सांगता येत नाही. पक्षांतर आता नेहमीचेच झालेले दिसून येत आहे. अशातच महाराष्ट्रात स्थापन झालेले शिंदे सरकार हे देखील याचे एक नवे आणि प्रभावी असे उदाहरण म्हणता येईल. विशेषतः एकाच पक्षांमध्ये दोन गट निर्माण होऊन ही तेढ निर्माण झाली आहे. याचे चांगले आणि वाईट दोघेही परिणाम महाराष्ट्रासोबत देशावर होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेत वाद झालेत. त्यानंतर दोन गट निर्माण झाले. एका गटात ठाकरे, दुसऱ्या गटात शिंदे. हे द्वंद्व इरेला पेटले. मधल्या काळात मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष सत्तेवर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याच पक्षामधून फुटून बंडखोरी करून इतर बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नव्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यात शिवसेनेने आपल्याच पक्षातील फुटीरता याची देही याची डोळा पाहिली. गेल्यावेळी अडीच वर्ष शिवसेनेचेच बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तर आता पुढील काही वर्षांसाठी शिवसेनेचेच बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार आहेत. एकूणच नाही म्हटले तरी गेली अडीच वर्ष आणि पुढील अडीच वर्ष शिवसेनेची सत्ता राहील यात वाद नाही. मात्र गेल्यावेळी मुख्यमंत्री म्हणून असलेल्या उद्धव ठाकरेंच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हात होता. आता मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मागे भारतीय जनता पार्टीचा हात असणार आहे.

ही झाली महाराष्ट्राची एकूण सद्यस्थिती. मात्र आता नव्याने एक प्रकरण समोर आले आहे. बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सिल्लोडचे आमदार तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेचे अत्यंत महत्त्वाचे म्हटले जाणारे अब्दुल सत्तार यांच्या गैरव्यवहाराचा तसेच गैरकृत्यांचा लेखाजोखा समोर आलेला आहे. आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होऊन आपल्या गैर कृत्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर याआधी देखील असलेल्या गैरव्यवहारांवरची कार्यवाई टाळण्यासाठी म्हणून ते सत्ताधारी पक्षात मुस्लिम असूनही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेत असल्याचा बनाव करत असल्याचा आरोप करण्यात आला असून खोट्या दांभिक हिंदुत्वाचा झगा पांघरून हिंदूंना शिवीगाळ करणारे, हिंदूंच्या देवतांच्या नावाने गोरगरिबांच्या जमिनी हडप करून त्यावर आपल्या स्वतःच्या मालमत्ता निर्माण करणारे, कुख्यात गुंड दाऊदचा वरदहस्त असलेले, तसेच सिल्लोड शहरात हिंदूंची फसवणूक आणि अत्याचार करून हिंदू विरोधी कार्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत असून त्यांना महाराष्ट्राच्या कोणत्याही मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करून त्यांना मंत्रिपदावर घेऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये शास्त्री कॉलनीतील रहिवासी महेश शंकरलाल शंकरपल्ली यांनी हा आरोप केला असून दांभिकतेचा आव आणणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचा सूर धरला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बिगर हिंदू असतानाही शिवसेनेसारख्या पक्षांमध्ये समावेश करणे, हा त्यांचा फक्त आपले कुकर्म झाकण्याचा एक कांगावा असल्याचा आरोप महेश शंकरपल्ली यांनी केला आहे.

याबाबत महेश शंकरपल्ली यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन देखील उच्चस्तरीय व्यक्ती व पदाधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. यात त्यांनी बरेच आरोप प्रत्यारोप केले असून याबाबत सुयोग्य असे पुरावे आपल्याकडे असल्याचे देखील सांगितले आहे. महाराष्ट्राच्या सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होऊन भाजपच्या पाठिंब्याने सध्या कॅबिनेट मंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र या आमदारांची काळी कृत्ये, भ्रष्ट कारभार, हिंदुत्वाला असलेला विरोध आणि दाऊद सोबत असलेले कनेक्शन याबाबत आपल्याला भाजपला अवगत करायचे असून त्यांचे पितळ उघडे पाडण्याचा एक प्रयत्न करत असल्याचे शंकरपल्ली यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पुढील सविस्तर माहिती कळवली आहे. ते म्हणतात आमदार अब्दुल सत्तार हे पूर्णपणे काँग्रेसचे विचारांनी प्रेरित अशी व्यक्ती असून, ते कोणत्याही प्रकारे हिंदुत्वाला समर्थन देऊच शकत नाही. आपल्यावर होणारी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अब्दुल सत्तार हे हिंदुत्ववादी असल्याचा बनाव करत असून शिंदेंच्या गटात सामील होण्याचे नाटक करत आहेत, असे ते म्हणाले.

अब्दुल सत्तार यांनी खोटी कागदपत्रे बनवून आशाबाई बोराडे यांची जमीन हडप केली आहे. अब्दुल सत्तार यांनी त्या जागेवर बेकायदेशीर रित्या भव्य महाविद्यालयाचे बांधकाम केले असून या विरोधात आशाबाई बोराडे यांनी आपल्या रक्ताने तक्रार लिहून प्रशासन सहसंचालक अंमलबजावणी संचालनालय दिल्ली यांना ही तक्रार पाठवली होती. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील व शहरातील अनेक गरीब लोकांच्या शेकडो एकर जमिनी खोटे कागदपत्र बनवून बेकायदेशीरपणे हडप केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. लोकांनी याबाबत तक्रारी करूनही पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, एका शेतकऱ्याला हिंदू दैवत हनुमानाच्या नावाने अश्लील आणि घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या असून दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रातील कुलदेवता विठ्ठल मंदिरात एक मराठा बांधवाला अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या शिव्या देत वक्तव्य केल्याचा व्हिडिओ महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत अनेक बातम्या देखील मोठमोठ्या वृत्तवाहिन्यांवर आल्या होत्या. मात्र याबाबत अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान अब्दुल सत्तार हे धुळे येथे पालकमंत्री असताना त्यांनी लव जिहाद विषयी पोलीस प्रशासनावर दबाव आणत अनेक हिंदू मुलींचे धर्मांतरासाठी मुस्लिम समाजातील मुलांना मदत केली असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये अब्दुल सत्तार यांची सीआयडी कडून चार प्रकरणांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतच्या तपासामध्ये अब्दुल सत्तार हे दोषी आढळले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता दुर्लक्षित केले होते. ही फाईल आजही महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाच्या टेबलवर पडून असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याबाबत महेश शंकरपल्ली यांनी 20 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र सरकारला एक माहितीपत्रक देऊन या प्रकरणाची कारवाई करण्याची मागणी केली होती. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात असलेल्या पुराव्यांसह लिखित तक्रारी करूनही अब्दुल सत्तार व त्यांच्या कुटुंबीयांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचार विरुद्ध काही महत्त्वाच्या विषयांवर 31 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडे देखील तक्रार केली आहे. मात्र आज पर्यंत त्यांच्या मार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसून आजपर्यंत अब्दुल सत्तार आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या तीन दशकात हजारो कोटींची बेनामी मालमत्ता आपल्या नावे जमा केली असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आलेला आहे.

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सह औरंगाबाद जिल्हाभरात अनेक शैक्षणिक संस्था असून महेश शंकरपल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ते दहा शैक्षणिक संस्था अब्दुल सत्तार आणि त्यांच्या कुटुंबाच्या आहेत. या संस्थांच्या नावावर असलेल्या मालमत्तेपैकी सुमारे 75 टक्के मालमत्ता पूर्णपणे बेनामी असून मनी लॉन्ड्री द्वारे या मालमत्तेत पैसे गुंतवले गेल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यासोबतच अब्दुल सत्तार यांचे दाऊदशी असलेले संबंध उघड असून या आधारे भ्रष्टाचार, अवैध धंदे, हजारो कोटींचा काळा पैसा, गरिबांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशीरपणे हडपणे, मनी लॉन्ड्री करून गुंतवलेले पैसे या सगळ्यांमध्ये सहभागी असलेले अब्दुल सत्तार आता एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले आहेत. त्यांच्यावर टांगलेल्या कायद्याच्या रोशापासून वाचण्यासाठी हिंदुत्वाचे खोटे ढोंग करणे ही महाराष्ट्राची फसवणूक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसवून सन्मानित करणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत निंदनीय बाब म्हटली जाऊ शकते.

हिंदुत्वाच्या मुद्द्याचे खोटे समर्थन करणारे अब्दुल सत्तार हे मात्र सिल्लोड शहराला अत्यंत वाईट वागणूक देत असून या ठिकाणी हिंदूंची फसवणूक आणि छळ सातत्याने केला जात आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली या शहरातून हिंदूंना हकले जात असून आपल्या शहरातून बरेच हिंदू स्थलांतरित झाल्याचे आणि बरेच लोक निर्गमन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे. सत्तार यांच्यासारख्या भ्रष्ट कलंकित आणि हिंदुत्व द्रोही व्यक्तीला मंत्रिमंडळात मोठे स्थान दिल्यास सिल्लोड शहरातून हिंदूंचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती देखील महेश शंकरपल्ली यांनी व्यक्त केली आहे. याबाबत काही शंका कुशंका असल्यास सिल्लोड शहर व तालुक्याचे गुप्त सर्वेक्षण करून याबाबत सत्य माहिती मिळवता येऊ शकते, जेणेकरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर ही वास्तविकता दिसून येईल. यासाठीच भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांना महेश शंकरपल्ली यांनी नम्रपणे विनंती करून अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी केलेल्या सर्व तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती केली आहे. यासोबत त्यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांना शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. महेश शंकरपल्ली यांनी सदर मागणी व विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केली आहे.

एकंदरीत आपल्या काळ्या कामांना लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सोबत राहून (मग तो कोणतेही असो) आपली झाकली मूठ उघड होणार नाही याची दक्षता सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली असल्याचे या प्रकरणावरून दिसून येते. याबाबत भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाने विशेषतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असलेला आपला ठाम निर्धार लक्षात घेऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे दिसून येते. अन्यथा ‘घर का भेदी लंका ढाए’ अशी शक्यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.