नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 76 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा घटल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानावा लागेल. कारण एका दिवसात 3 हजार 874 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा आदल्या दिवशी नोंदवलेल्या एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींच्या विक्रमापेक्षा जवळपास 650 ने कमी आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 76 हजार 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 874 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 69 हजार 77 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 57 लाख 72 हजार 400 वर गेला आहे. देशात 2 कोटी 23 लाख 55 हजार 440 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 87 हजार 122 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 31 लाख 29 हजार 878 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 18 कोटी 70 लाख 9 हजार 792 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.