नवी दिल्ली – लोकशाही न्युज नेटवर्क
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं बुधवारी जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत तब्बल 56 विद्यार्थ्यांनी 100 गुण मिळवले आहेत, अशी घोषणा एनटीएनं केली. त्यासह या परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं 39 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. या 39 विद्यार्थ्यांना आता तीन वर्षासाठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेला बसता येणार नाही, असंही एनटीएनं जाहीर केलं.
महाराष्ट्रातील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळाले 100 गुण : जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात 56 विद्यार्थ्यांनी तब्बल 100 गुण मिळवले आहेत. त्यातील तेलंगाणा राज्यातील 15, आंध्रप्रदेश 7 आणि महाराष्ट्र 7, दिल्ली 6 आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक करण्यात येत आहे. जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत मिळवलेले गुण हे बहुसत्र पेपर्समध्ये मिळवलेले असतात. प्राप्त गुण विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सत्रासाठी 100 ते 0 गुणांच्या स्केलमध्ये रुपांतरीत करण्यात येतात, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एका अधिकाऱ्यानं दिली.