श्रीलंकेमार्गे सहा दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी ; देशभरात हाय अलर्ट

0

नवी दिल्ली : काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम भारताने रद्द केल्यानंतर देशात अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानकडून वेळोवेळी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता देशात सहा दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे देशातील महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना लश्‍कर-ए-तोयबाचे हे दहशतवादी असून त्यांच्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतामध्ये याआधी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली होती. तसेच गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता वर्तवत याआधी 9 ऑगस्ट रोजी हाय अलर्ट दिला होता. यामध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्‍मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्‍यता वर्तवण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.