खामगाव (प्रतिनिधी) अस्मानी सुलतानी संकट व लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोफत बि- बियाणे, खते व कीटनाशक औषधे पुरवठा करून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.
मागील वर्षी खरीप हंगामा दरम्यान अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे आणेवारी 50 पैशाच्या आत आली आहे, कोरोना महामारीमुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम समाजातील अनेक घटकांवर झाला आहे. तर लॉकडाऊनमुळे शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकरीही आर्थिक अडचणीत आला आहे. तर बँकामार्फत पीक कर्जाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, पैशा अभावी शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते व कीटनाशके ,आवश्यक शेती औजारे खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना मोफत बि- बियाणे, खते व कीटनाशक औषधे पुरवठा करून दिलासा देण्यात यावा, अशी विनंती निवेदनात केली आहे.