शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठीआवश्यक उपाययोजनांवर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
मुक्ताईनगर, दि. 15 (प्रतिनिधी) – शेतकरी केंद्रबिंदू माणून राज्य शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा पाणीपुरवठा आणि कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर राज्य शासन भर देत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुक्ताईनगरच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आवश्यक उपाययोजना करण्यास यापूर्वीच सुरुवात केली असून बोदवडचा पाणी प्रश्न, वढोदा व्याघ्र प्रकल्पाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले
मुक्ताईनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार, उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,  मेळाव्याचे संयोजक आमदार चंद्रकांत पाटील, आ. चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, रवींद्र पाटील, यामिनी पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी मिळाली आहे. ही जबाबदारी पेलत शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला यांच्यासाठी काम करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. सर्वप्रथम दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नंतरच्या टप्प्यात दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कसे प्रोत्साहन देता येईल यासंदर्भातील योजना जाहीर करण्यात येतील. शेतकऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे हे सरकार आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना एकत्र घेऊन राज्याच्या विविध भागातील प्रश्न सोडविण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा, नाशिक विभागात याप्रकारे जिल्हावार बैठका घेऊन अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्यात आले आहेत. राज्यातील महिला वर्गाच्या सशक्तीकरणासाठी बचत गटांना सक्षम करणारी योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
मुक्ताईनगरच्या प्रलंबित प्रश्नांबाबत यापूर्वीच कार्यवाही सुरू करण्यात आले असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक लवकरच झालेली दिसेल असे ते म्हणाले.
खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्र सक्षम बनवण्यासाठी विकासकामांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले. अर्धवट राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यावर भर असल्याचे सांगून त्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद केली तर चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त केला. यापुढील काळात केवळ शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही तर कुटुंबातील प्रत्येकाने शेतीसह इतर व्यवसायांकडेही वळले पाहिजे. या भागात औद्योगिक विकासासाठी काम करण्यावरही राज्य शासनाने भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कृषी मंत्री श्री भुसे म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन काम करत आहे. स्मार्ट योजनेअंतर्गत कृषी विकासाची योजना आणत असल्याचे ते म्हणाले. केळी संशोधन केंद्र क्षमता वाढवणे आणि
केळी पिकाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष हे राज्य शासन दुर करेल. त्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही राज्यस्तरावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक करताना आ. पाटील यांनी मतदार संघातील विविध प्रश्न मार्गी लावण्याची गरज व्यक्त केली.
संयोजकांच्या हस्ते मुख्यमंत्री ठाकरे आणि खासदार पवार  यांचा सत्कार करण्यात आला.
मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या पटांगणावर या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्हाभरातील शेतकरी आणि महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.