लग्नसोहळ्यात शोभेच्या वस्तूंऐवजी कोरोनाचे पोस्टर्स; जळगावातल्या अनोख्या विवाह सोहळ्याची राज्यात चर्चा
जळगाव : जळगाव शहर तसेच इतर ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. लग्नसोहळा, सार्वजनिक कार्यक्रम यात 50 जणांनाच जमण्यास परवानगी नाही. मात्र, लग्न समारंभ, खासगी कार्यक्रम यामध्ये सर्रासपणे गर्दी केली जाते. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जात नाही. या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये एक आदर्श विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले. कोरोना नियम पाळल्यामुळे या अनोख्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. 2 मार्च रोजी हा विवाह पार पडला.
विवाह कसा पार पडला?
एकीकडे विवाह सोहळ्यांमध्ये बेजबाबदारपणाच्या असंख्य घटना रोज आपल्यासमोर येतात. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. मात्र, सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत जामनेरमध्ये एक जबाबदार विवाह सोहळा पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील यांचे पुतणे स्वप्नील आणि जामनेर येथील रमाकांत पाटील यांची कन्या सायली यांचा हा विवाह सोहळा होता.
स्वप्नील आणि सायली यांचा विवाह होण्यापूर्वी कोरोना संसर्ग वाढला. त्यामुळे जळगावमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले. या निर्बंधाअंतर्गत अनेक सार्वजिनक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. विवाहासारख्या कार्यक्रमात फत्त 50 जणांनाच जमण्याची मुभा आहे. त्यामुळे स्वप्नील आणि सायली यांनी त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे ठरवले. यावेळी त्यांनी फक्त 50 जणांनाच लग्नासाठी आमंत्रण दिले. तसेच, सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले. यावेळी या लग्नाला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेसुद्धा उपस्थित होते. स्वप्नील, सायली तसेच या दोघांच्याही कुटुंबीयांनी सामंजस्याची भूमिका घेऊन कोरोना नियम पाळल्यामुळे गुलाबराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
काय काय खबरदारी घेण्यात आली?
जामनेर येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यामध्ये कोरोना नियमांचे पूर्णपणे पालन केले गेले. या लग्नामध्ये प्रत्येकाने सोशल डिस्टनसिंगचे पाळले. तसेच, प्रत्येक वऱ्हाडीला मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. लग्नमंडपात सजावटीच्या जागी कोरोना पासून मुक्तीसाठीचे बॅनर लावण्यात आले. विशेष म्हणजे नगरपालिका प्रशासनाने या लग्नाची दखल घेत प्रमाणपत्र देऊन वर-वधूंचा सन्मानदेखील केला. या उपक्रमामुळे सायली आणि स्वप्नील यांच्या लग्नाची चर्चा संपूण महाराष्ट्रात होत आहे.