मुंबई: महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाला नसल्याने लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आला आहे. १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘ मिशन बिगिन अगेन ‘च्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही अटींवर जीम सुरू करण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मात्र मॉलमधील रेस्टॉरन्ट, थिएटर व फुडकोर्ट हे बंदच राहतील. दरम्यान, आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासाबाबतचा निर्णय केंद्राने राज्यांवर सोडला असताना जिल्हाबंदी उठवण्याबाबत मात्र सरकारने तूर्त कोणताही निर्णय घेतलेला नाही.
शासकीय कार्यालयांत १५ टक्के व १५ कर्मचारी यामध्ये जी संख्या अधिक असेल त्या संख्येने कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य राहील. १० कर्मचारी वा १० टक्के कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढ्या उपस्थितीने खासगी कार्यालये सुरू ठेवता येतील. गणेशोत्सव २२ आॅगस्टपासून सुरू होत आहे या काळातही लॉकडाऊन कायम असेल.
आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी नाही
केंद्र सरकारने आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी दिली आहे ; मात्र राज्य शासनाने ती दिलेली नाही. कोरोनाग्रस्तांचा चार लाखाचा आकडा राज्याने पार केला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन कायम ठेवण्याची भूमिका उद्धव ठाकरे सरकारने घेतली आहे.
क्रीडा प्रकारांना अनुमती
काही क्रीडा प्रकारांना मात्र अनुमती दिली आहे. त्यात असांघिक (वैयक्तिक) खेळ असतील. गोल्फ कोर्स, फायरिंग रेंज, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब व आऊटडोर जिमनॅस्टिक यांना परवानगी दिलेली आहे. रेस्टॉरन्ट सुरू करण्याची जोरदार मागणी मालकांनी केली असली तरी ती मान्य झालेली नसल्याने रेस्टॉरन्ट सुरू होण्यास प्रतीक्षाच करावी लागेल. मात्र होम डिलिव्हरीची परवानगी कायम असेल.