जळगाव :- शहरातील आशाबाबा नगराजवळील खंडेराव नगरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते व गटारींच्या सुविधा नाहीत. गेल्या चार वर्षांपासून रस्ते व गटारींसाठी अनेकदा निवेदने देवूनही विकासकामे झालेले नसल्याने महिलांनी सोमवारी धेट मनपात येवून समस्या मांडल्या. यावेळी महिलांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे, आ. राजुमामा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, नगरसेवक ललीत कोल्हे यांना निवेदन देवून समस्या त्वरित सोडविण्याची विनंती केली आहे.
गेल्या 10 ते 12 वर्षांपासून या भागात आमचा रहिवास आहे. महापालिकेचा करभरणाही आम्ही वेळेवर करतो. मात्र अद्यापही आमच्या भागात मुलभूत सोयी रस्ते व गटारींची विकासकामे करण्यात आलेली नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
रस्त्यांअभावी हाल
गेल्या अनेक वर्षांपासून रस्तेच नसल्याने पावसाळ्यात चिखल होवून वाहने त्यात फसून अपघात होतात. चिखलामुळे पायी चालणेही दुरापास्त होते. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या पावसाळ्यांत असे हाल असल्याने हवाहवासा पावसाळा आम्हाला नकोसा झाला आहे.
गटारींअभावी पाणी तुंबले; आरोग्य धोक्यात
परिसरात गटारी नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे छोटे छोटे तलाव, डबके आकारास आलेले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती होवून अनेक साथरोग पसरतात यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा
रस्ते गटारींच्या पुर्ततेसाठी गेले चार वर्षे आम्ही चकरा मारत असल्याचे रहिवासी नागरिक मिना कापुरे, सिमा बडगुजर, सोनाली बारी, उर्मिला ठाकूर आदी महिलांनी सांगितले. तर पुरावा म्हणून 2016/17 च्या निवेदनाची प्रतच दाखविली. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन स्वीकारल्याचा उल्लेख आहे.