नागपूर : आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेच्या मुद्द्यावरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपानं यावेळी केली.
हिवाळी अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा सरकारला कोडींत पकडण्याचे संकेत अगोदरच मिळाले होते. आज कामकाजाला सुरूवात होण्याआधीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आमदार ‘मी पण सावरकर’ उल्लेख असलेल्या टोप्या परिधान करून विधिमंडळ परिसरात दाखल झाले. त्यानंतर विधान सभा आणि विधान परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर भाजपा आमदारांनी निदर्शनं केली.
यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा भाजपा आमदारांनी धिक्कार केला. राहुल गांधी, सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. याचबरोबर अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणीही भाजपानं केली.