मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. राज्यात दररोज नव्या रुग्णांचा उच्चांकी आकडा समोर येतोच आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात ३८२७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आत्तापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. त्याआधी ३७५२ नवे रुग्ण आढळले. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 1,24,331 झाली आहे.
दिवसभरात कोरोनामुळे 142 मृत्यूदेखील झाले आहेत. त्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईतले आहेत. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची वाढती संख्या ही दिलासादायक गोष्ट असली तरीही राज्याचा मृत्यूदर देशाच्या सरासरीच्या तुलनेत अधिकच आहे. देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 3.36 आहे. तोही गेल्याच आठवड्यात 2.8 वरून वाढून एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.74 झाला आहे.
तर मागील २४ तासात 1935 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ कायम आहे. सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 16 जूनच्या आठवड्यात रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 3 टक्क्यांवर आला आहे. तो 31 मे च्या आठवड्यात 4 टक्के होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली, तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने ही आकडेवारी समोर दिसत आहे.