मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलला आहे. मराठा आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा आहे. आता केंद्राने तात्काळ त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी करतानाच आमच्याकडे चावी आहे, आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न उघडू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे. कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी आंदोलनाची सुरुवात झाली, त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या सर्वच घटकांची सहानुभूती आणि पाठिंबा आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री यांना साकडे घातले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची प्रमुख भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. मराठा आरक्षणाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हे सर्व शांतपणे आणि सुरळीत पार पडेल आणि केंद्र सरकार या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल अशी आम्हाला खात्री आहे, असं राऊत म्हणाले.