भुसावळ :- शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून या उष्णतेमुळे जमिनी मधील लाव्हारस उकळून जमिनीला तडे पडून भूकंप होण्याची शक्यता असते. असाच काही प्रकार शहरातील वांजोळा रोडवरील श्रीराम नगर भागात दि 21 मे मंगळवार रोजी दुपारी घडला आहे. याठिकाणी अचानक एका गटारी जवळील जमिनीतून धूर निघत असल्याचे परिसरातील काही रहिवाशांनी बघितले. ही बाब त्यांनी परिसरात इतरांना सांगितली व त्या सर्वांनी आश्चर्याने त्या ठिकाणी खोदून बघितले . तेव्हा ही जमीन अतिशय तापलेली आढळून आली यामुळे अतिउष्णतेमुळे सतत धूर बाहेर येत होता.या जमिनीवर पाणी भरून भांडे ठेवले असता त्यातले पाणीही गरम झाले. या प्रकारामुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या ठिकाणाहून सायंकाळ पर्यंतही धूर निघतच असल्याचे रहिवाश्यानी सांगितले.जमिनीतून धूर निघण्याचा हा प्रकार नेमका काय याचे नागरिकांना आश्चर्य वाटले असून उत्सुकता वाढली या भागात अतिउष्णतेने जमिनीतील लाव्हारस तप्त होऊन धूर निघत असावा वा ज्वालामुखी सारखा प्रकार तर नसावा, अशा अनेक शंका या प्रकारामुळे उपस्थित होत आहे. तसेच उनपदेवसारखा काही प्रकार आहे की, मध्यंतरी बीड जिल्ह्यात उघडकीस आलेला तुटलेल्या विजतारेच्या प्रवाहामुळे मुरुमाचे दगड विरघळण्या सारखा वीज प्रवाहाचा काही संबंध याठिकाणी नसावा ना ? अशा एक ना अनेक शंका उपस्थित होत आहेत. प्रशासनाने या प्रकारची त्वरित दखल घेवून कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.