भातखंडे (प्रतिनिधी) : भातखंडे परिसरात अलीकडेच जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरीसुद्धा या भागात “कही खुशी कही गम” अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
या भागातील बांबरुड ,पिंपळगाव पर्यंत जोरदार पाऊस झालेला आहे. आणि ह्या अति जोरदार पावसाने या भागातील ऊस, कापूस, मका,ही पिके पूर्णपणे भुईसपाट झाल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारणही तसेच आहे पावसाबरोबर सुसाट वारा असल्यामुळे उभी असलेली पिके पूर्णपणे झोपलीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. तर याउलट परिस्थिती गिरड, अंतुर्ली, भातखंडे, उत्राण, तळई या परिसरात दिसून येत असून या परिसरात पाऊसच पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी व कापसासाठी अजून एक चांगल्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. तरच पुढील हंगाम व्यवस्थित येईल असे जाणकार शेतकरी बोलत आहेत. अन्यथा अगोदरच मूग ,उडीद ही पिके आलीच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. म्हणून बळीराजा पुन्हा एकदा या भागांमध्ये जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.