चेन्नई :– बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तीव्रता वाढत जाऊन येत्या १२ तासांत तामिळनाडूलगतच्या समुद्रात चक्रीवादळाचे संकेत आहेत. या चक्रीवादळाचे नाव फनी असे आहे. “फणी’ वादळ सध्या हिंद महासागरात विषववृत्ताजवळ आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्वेकडील भागाजवळ आहे. भारतीय हवामान विभागाने दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हे वादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. फनी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही पावसाळी स्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
येत्या काही दिवसात हा पट्टा श्रीलंकेच्या किनाऱ्यावरुन तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल, यामुळे येत्या 30 एप्रिल आणि 1 मे ला आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूच्या काही भागात आणि केरळमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रीलंका, तामिळनाडू आणि आंध्रच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यालाही या वादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.