जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
हिंदू धर्मात तुळशी विवाह हा पुर्वापार चाललेला अतिशय महत्वाचा उत्सव असुन त्याला पौराणिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दिपावली झाल्या नंतर प्रत्येक वर्षी लगबग सुरू होते ती तुळशीच्या विवाहाची तुळशी म्हणजे लक्ष्मीचे रूप कार्तिकी भागवत एकादशीला हा विवाह लावण्यात येतो. लक्ष्मी व नारायणाची मुर्ती तुलसी पत्रासोबत सोने व चांदीच्या आसनावर बसवून गोरज मुहुर्तावर वधू तुळशी आणि वर विष्णू यांचे लग्न केले जाते.
या विवाहामुळे भगवान विष्णू व आई लक्ष्मी प्रसन्न होते. पोथी – पुराणात सांगितल्या प्रमाणे भगवान विष्णू शाळिग्राम व तुळस ही लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते.सुंदर आकर्षक रांगोळी काढुन व विविध प्रकारच्या सजावटीसह खऱ्या विवाहाप्रमाणे तयारी केली जाते. ऊसाच्या डेरेदार धांडे एकमेकांना बांधुन खाली चौरंगावर विधी वत पुजन करीत मंगलाष्टके व मंत्रोच्चारण करुन विवाह संपन्न करण्यात येतो.
विवाह झाल्यानंतर रंगबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. या कार्तिकी भागवत एकादशीला तुळशी विवाहाच्या निमित्ताने शहरातील जामनेर पुरा भागातील नागरिकांच्या वतीने या धार्मिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते.