जळगाव: कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान निधीत आमच्या पगाराच्या रकमेतील एक लाख रूपये दिले, तर विरोधकांच्या पोटात का दुखतय? तेच आम्हाला कळत नाही. आम्ही कुठे परदेशात तर पैसा दिलेला नाही ना? असा सवाल भाजपचे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातही या व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान,कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स निधीची स्थापना केली आहे.यामध्येच काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटीनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. भाजपचे नेते व माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही पी.एम.फंडात रक्कम दिली आहे. तसेच त्यांनी या फंडात रक्कम देण्याबाबत आवाहनही केले आहे.भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी आपल्या पगारातील रक्कम पंतप्रधान निधीत दिल्याबद्दल नेटीझन्सनी भाजप आमदारांना ट्रोल केले आहे.
आम्ही पी.एम.फंडाला रक्कम दिली. केंद्र काय देशाबाहेर आहे काय? तो पैसाही देशातच खर्च होणार आहे. आजच्या परिस्थितीत राज्याला जी मदत येत आहे. ती केंद्राकडूनच येत आहे. केंद्राकडून तांदुळ, गहू वाटप केले जात आहेत. निराधार तसेच अंपगाना मदत केंद्राच्या योजनेतूनच केली जात आहे. 500 रूपये महिलाच्या खात्यावर केंद्र शासनानेच जमा केले आहेत. तब्बल 1600 कोटी रूपयाची साहित्य खरेदीचे केंद्राने केली आहे, असंही महाजन म्हणाले आहे.
मी स्वत: माझ्या मतदार संघात जनतेसाठी काम करीत आहे. माझ्या जामनेर मतदार संघात जामनेर, शेंदुर्णी येथे दररोज दहा हजार लोकाना जेवण तसेच शिधा वाटप करीत आहे. जळगावातही आम्ही जेवण देत आहोत. मास्क तसेच सॅनेटायझरचे वाटप केले आहे. हे सर्व आम्ही राज्यातील जनतेसाठीच करीत आहोत. त्याची किंमत केल्यास केल्यास ती कोटयवधी रूपये होईल. मग आम्ही पंतप्रधान निधीस आमच्या पगारातील एक लाख रूपये तर याच्या पोटात दुखतंय.परंतु पंतप्रधान फंडाबाबत भाजपवर जो काय आरोप केला जात आहे. तो अत्यंत चुकिचा आहे. हे सर्व थाबवून आपण सर्वांनी “कोरोना’विरूध्द लढण्याची गरज आहे. असे मतही महाजन यांनी शेवटी व्यक्त केले.