पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यात दि २९ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस, सुसाट्याचा वारा, व गारपिटीमुळे मका, दादर, बाजरी व गव्हाची पिके आडवी झाल्याने शेतऱ्यांचे हाती आलेले पिक वाया गेले आहे. आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील तालुका कृषी अधिकारी अशोक जाधव, मंडळ अधिकारी यांनी दि १ मार्च रोजी नुकसानीची पाहणी केली होती.
यात पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.), वरसाडे, जवखेडी दिगर, राजूरी बु”,राजूरी खु”, वाणेगाव, लासुरे, निंभोरी बु”, निंभोरी खु”, शिंदाड, पिंप्री खु” प्र.पा., सातगाव (डोंगरी), भोजे, चिंचपूरे, वाडी, शेवाळे, खडकदेवळा खु”, खडकदेवळा बु”, तारखेडा बु”, तारखेडा खु”, लोहारी बु”, लोहारी खु”, आर्वे, चिंचखेडा बु” या ३४ गावांचा समावेश असून तहसिलदार कैलास चावडे यांनी बाधीत शेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे नायब तहसिलदार उमाकांत कडनोर यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत मिळण्यासाठी आमदार किशोर पाटील हे अधिवेशनात प्रश्न मांडुन शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. याकामी संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, व कृषी सहायक संयुक्त रित्या पंचनामे करणार आहेत. तालुक्यात ३ हजार ६७१ शेतकऱ्यांचे ४ हजार ५८९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.