पुणे, लोकशाही न्यूज
परदेशात भारताला पहिलं पदक मिळवून देणारे भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. त्यांच्या या निधनानंतर क्रिडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
नाटेकर यांनी तब्बल 15 वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या 15 वर्षाच्या कारकीर्दीत 100 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदक जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणारे ते पहिले भारतीय होते. त्याचबरोबर त्यांनी 6 राष्ट्रीय पदकं जिंकली आहेत.
नंदू नाटेकर यांचा मुळचा जन्म सांगलीचा. 1953 साली त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात झाली होती. त्यावेळी त्यांचं वय केवळ 20 वर्ष होतं. 1980 आणि 1981 मध्ये त्यांनी दुहेरी पदक जिंकलं होतं. भारताने ज्यावेळी थाॅमस चषक जिंकला होता. त्यावेळी नंदू नाटेकर भारतीय संघाचे सदस्य होते. दरम्यान, 1951 ते 1963 मध्ये झालेल्या 16 एकेरी सामन्यात 12 सामने जिंकले. तर डबल्समध्ये 16 पैकी 8 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याच्या दिमाखदार कामगिरीमुळे क्रिडा क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराचे ते मानकरी देखील होते.