अहमदनगर :-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा मंजूर झाला असला तरी सध्या ते पक्ष सोडणार नाहीत. यासंबंधीचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. “राष्ट्रवादीने काँग्रेससाठी नगरची जागा सोडावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र स्वत: राहुल गांधीच पाठिशी राहिले नाहीत. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढा, असं म्हणणं माझ्यासाठी धक्कादायक होतं, असं राधाकृष्ण विखे पाटील पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले.
विखे यांनी आज लोणी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, यापुढे पाणी प्रश्नावर संघर्ष उभारणार एवढेच सांगत राजकीय भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्याच ठेवली. अहमदनगर लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच दिला. त्यांची ही भूमिका पाहून धक्का बसला. नगरला राष्ट्रवादीचा तीनवेळा पराभव झाला. त्यामुळं ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी होती. पवारांना त्यासाठी भेटलो. पण आमच्याच पक्षातल्या नेत्यांनी ती जागा काँग्रेसला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. अशी टीका विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केली. चक्क वरिष्ठ नेतेच पक्ष सोडण्यास सांगत होते, हे धक्कादायक होते. त्यामुळे डॉ. सुजय याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपणही १५ मार्चला विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा पाठवून दिला, असे विखे यांनी सांगितले.