अमृतसर : अमृतसर, बटाला आणि तरुणतारण या जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने ३८ जणांचा मृत्यू झाल्याने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, विषारी दारू बनवून, ती विकल्याबद्दल एका महिलेला अटक केली आहे. या धंद्याच्या सूत्रधारांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन केले आहे. ही विषारी दारू आणखी काही जिल्ह्यांत विकली गेली आहे का, याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
लॉकडाउनच्या काळात पंजाबमध्ये दारूची दुकाने अनेक ठिकाणी बंद आहेत, तर काही ठिकाणी त्यावर निर्बंध आहेत. तसेच दारूचा काळाबाजारही सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी बेकायदेशीर हातभट्ट्या सुरू झाल्या आहेत. तेथूनच ही दारू विकली गेली असावी, असा अंदाज आहे. मात्र त्यात मुद्दाम विषारी द्रव्य मिसळण्यात आले की मिश्रणात चूक झाल्याने विषारी दारू तयार झाली, याचाही शोध पोलीस घेत आहेत. ही दारू स्वस्तात मिळाल्यामुळे लोकांनी ती प्राशन केली असावी, असे पोलिसांना वाटते आहे.