मुंबई: चेंबूर भागात बलात्कार झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. चार जणांनी केलेल्या पाशवी बलात्कारानंतर या मुलीचा कमरेपासून खालचा भाग पूर्णतः निकामी झाला होता. नराधमांनी केलेल्या सामुहिक अत्याचारामुळे पीडितेला शारिरीक वेदनेसह प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला सावरता आले नाही. अत्याचारामुळे झालेल्या रक्तस्त्रावाने तिची प्रकृती अधिक नाजूक अवस्थेत गेली होती.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईत भावाकडे राहण्यास आली होती. मैत्रिणीच्या वाढदिवसाला म्हणून ७ जुलै रोजी ती घराबाहेर पडली. त्याच दिवशी चेंबूरच्या लाल डोंगर भागात तिच्यावर चौघांनी बलात्कार केला. मात्र, घरी आल्यानंतर घाबरलेल्या पीडितेने कोणालाच काही सांगितलं नाही. वेदना सहन करत ती तशीच झोपून राहिली. दोन दिवसानंतर तिचे पाय लुळे पडू लागले. हातापायातून थरकाप होऊ लागला. हा प्रकार अर्धांगवायूचा समजून तिला गावी पाठवण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार झाले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नसल्यामुळे तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पीडितेचा जीव वाचवण्यात त्यांना अपयश आले.