नवी दिल्ली :- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’वरून कोर्टानेही मान्य केल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘आता सुप्रीम कोर्टदेखील म्हणत आहे की, चौकीदार चोर हैं’, या राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात भाजच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर आज पुन्हा सुनावणी होती. परंतु, भाजपही राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने क्लिन चीट दिल्याचं वक्तव्य करत असल्याचं राहुल गांधी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
राहुल गांधी यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयासमोर आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात त्यांनी जुन्याच मुद्द्यांचा आधार घेत न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलं. मात्र भाजप राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने क्लिन चीट दिल्याचं सांगून बाहेर त्याचा फायदा उठवत असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. दरम्यान, लेखी आणि राहुल यांनी याप्रकरणावर अधिक उत्तर देण्यासाठी मंगळवारपर्यंत वेळ वाढवून देण्याची कोर्टाला विनंती केली आहे.