नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली असून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 24,882 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 140 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,13,33,728 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,58,446 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (13 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे.