मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुन घातला आहे. देशातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात २४ तासांत तब्बल १५ नवे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे. महत्वाची बाब म्हणजे मागील १२ तासांत एकट्या मुंबईत कोरोनाचे नवीन १० रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सगळ्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. सध्याच्या घडीला एका करोनाग्रस्ताची स्थिती थोडी गंभीर आहे. रुग्णसंख्या वाढली आहे मात्र लोकांनी काळजी करु नये. शक्यतो घरी रहावं, घराबाहेर पडू नये, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. मात्र कुणीही घाबरुन जाण्याचं कारण नाही. लॉकडाऊनला प्रतिसाद द्या, घरातून बाहेर पडू नका, करोनाचा फैलाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळा असंही त्यांनी म्हटलं आहे. आज लोकल ट्रेन बंद असल्याने सोमवारच्या दिवशी खासगी वाहनांनी मुंबईत जाण्यासाठी गर्दी होते आहे. ही गर्दी करणं चुकीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लोकांनी ३१ मार्च पर्यंत संयम पाळावा. आज जे अनावश्यक कारणाने मुंबईत जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असाही इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.