जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सण आणि कोरोनाकाळ यामुळे मागील काही दिवसापासून घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे अर्थकारण बिघडले आहे. गॅसचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींसह कुटुंबप्रमुख चिंतेत आहे. सध्या महागाई वाढत आहे. आता कुटुंब कसे चालवायचे आणि उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांना भेडसावत आहे. मोलमजुरी करणारे लोक ही सध्या चिंताक्रांत आहेत.
१ जानेवारी ते १ सप्टेंबर दरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रत्येकी १९० रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजी व सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे २०२० पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०.५ रुपये प्रति सिलिंडर होती. ती आता तब्बल ९०० रुपयांपर्यंत गेली आहेत.
कोरोना संकटामुळे आधीच जनता त्रासली आहे. अनेकांचे रोजगार हातातून गेले. त्यातच महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढत आहे. कॉर्पोरेट युगात गॅस ही अत्यावश्यक व गरजवंत गोष्ट आहे. गॅस ही सध्या प्राथमिक गरजवंत गोष्ट झाली आहे. सर्वसामान्यांचे कंबर मोडले आहे, मात्र गरिबांना तर उपाशीच मारावे लागणार आहे. जीवनावश्यक खर्च सामान्यांच्या हाताबाहेर जात आहे. रोजगार गेल्यामुळे सध्या इंधन दरवाढ हा कुटुंबाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा बनली आहे.
-आसावरी देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या
९०० रुपयांपर्यंत सिलिंडर घ्यायला परवडत नाही. आता सौरपेटीवर अन्न शिजवायची वेळ येऊन ठेपली आहे. अत्यावश्यक गरज म्हणून सिलिंडरकडे पाहिले जाते, मात्र ते दिवसेंदिवस महाग होत चालल्याने सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत चालली आहे.
– तुषार पाटील, नागरिक