जळगावः करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू केलेल्या लॉकडाउनचा पहिला टप्पा काल पूर्ण झाला. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी देशातील काही जिल्हे “कोरोना’मुक्त झाले आहे. यामध्ये जळगाव जिल्हा देखील आता “कोरोना’मुक्त झाला आहे. कारण जिल्ह्यात “कोरोना’ पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा “कोरोना’मुक्त झाला आहे.
जळगावात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सदर रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्यामुळे आता जिल्हा कोरोना मुक्त झाला असून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 742 जणांचे स्क्रिनिंग झाले. 249 जणांचे नमूने पाठविले होते.229 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 16 जणांचे अहवाल पेंडिंग आहे. दोन जणांचे अहवाल रिजेक्टेड आहेत.आता 47 संशयित रुग्ण क्वारंटाईन आहेत. 13 जण नवीन संशयित दाखल झाले आहेत.
दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवांची दुकानाची वेळ अकरा ते पाच अशी करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सामानच घेण्यासाठी मास्क लावूनच बाहेर पडावे. गर्दी करू नये. सोशल डिस्टन्स ठेवावे. यामुळे जिल्ह्यात “कोरोना’चा संसर्ग होणार नाही. जशी सतर्कता आतापर्यंत पाळली, तशीच पुढेही पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. दुकानदारांना शक्यतोवर किराणा, भाजीपाला घरपोच देण्यास सांगितले आहे. जिल्हा कोरोना मुक्त झाला असला तरी जनतेने यापुढेही असेच सहकार्य करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..
“ग्रीन लिस्ट’मध्ये समावेश होणार
“कोरोना’च्या एका संशयित रुग्णामुळे जळगाव जिल्ह्याचा सामावेश शासनाने ऑरेंज लिस्ट मध्ये केला होता. आजच्या स्थितीत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही. यामुळे जळगाव जिल्ह्याचा सामावेश ग्रीन लिस्टमध्ये होणार आहे.