मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. गर्दीमुळे हा व्हायरस अधिक पसरण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी अजून कशी कमी करता येईल यावर राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्याच पार्श्वभमूमीवर अनेक ऑफिसांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आलं. पण असं असताना सगळ्यात धोक्याची आहे ती मुंबईची लोकल. कारण रोज लाखो मुंबईकर रेल्वेनं प्रवास करतात. त्यामुळे मुंबईची लोकल कोरोनामुळे बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. याबद्दल मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. आज दुपारी 3:30 वाजता यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल बंद करायची की नाही यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं टोपे म्हणाले. मास्क सॅनिटाझयरची बनावट विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा टोपेंनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं तर सुरक्षित आणि आरोग्यदायी रहा असा सल्ला दिला आहे.
देशात कोरोनाची लागण झालेले सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे भारतात मृतांची संख्याही तीन झाली आहे. आज मुंबईतही कोरोनाने पहिला बळी घेतला. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्याची वेळ येऊ शकते.