मुंबई: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या २४ तासांत ७७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण आकडा ३०२वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. करोनाशी लढ्याचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा जवळ आला आहे, असं ते म्हणाले. या करोनाविरुद्धच्या लढ्यात आपण जिंकणारच असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक फोन आले. मात्र, “कोणाच्याही वेतनात कपात केलेली नाही. फक्त काही टप्प्यात विभागणी केलेली आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेत कपात केलेलं नाही. कुणाचंही वेतन कपात केलेली नाही. थोडीशी घडी नीट बसवण्यासाठी आपण मांडणी करत आहोत. सर्वांनी सहकार्य करावं,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.