औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका उपमहापौर पदावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीमुळे औरंगाबाद महापालिकेत उपमहापौरपद खेचून आणण्यात शिवसेनेला यश आलं. राजेंद्र जंजाळ यांना ५१ मते पडली. त्यांच्याविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवाराला ३२ मते मिळाली.
शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यानंतर भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले. त्यासाठी मंगळवारी निवडणूक झाली. महाविकास आघाडीत उपमहापौरपद काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली.
उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे जंजाळ, काँग्रेसचे अफसर खान, भाजप पुरस्कृत गोकुळ मलके, एमआयएमकडून जफर बिल्डर असे उमेदवार होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजेंद्र जंजाळ यांना मतदान केलं.काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटल्यामुळे शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांना 51 मतं मिळाली. भाजप पुरस्कृत मलके यांना 34, तर एमआयएमच्या जफर बिल्डर यांना 13 मतं मिळाली.