दुपारी तर शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण ; प्रचंड उष्म्याने जनजीवनावर परिणाम
* नाजनीन शेख *
जळगाव ;– आग ओकणारया सुर्यामुळे दुपारी तर शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण दिसून येते. सायंकाळानंतरच नागरीक घराबाहेर पडणे पसंत करतात. यंदा तर उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे.तापमानाने आतापर्यंतची कमाल पातळी गाठली असून प्रचंड उष्म्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.यंदाच्या उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने कहर केला असून,४५ डिग्री सेल्सिअस हुन अधिक तापमान झाल्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्त्यावर अघोशित संचारबंदी सदृश्य स्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर पडला असला तरी लग्न सराईच्या निमित्ताने दुकानात काही प्रमाणात वर्दळ दिसत आहे.
एप्रिल महिन्यात तापमानातं हळू हळू वाढ होत असताना, गेल्या आठ दिवसापासून अचानक उच्चांक घटल्याने सध्या स्थितीत तापमानाने पारा ४५.६ अंश सेल्सियसचा आकडा पार केला आहे. उन्हाच्या वाहत्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या जीवाची काहिली होत आहे. यापासून बचाव करण्यासाठी थंड पदार्थे व फळे खाण्याकडे नागरिकांचा काल वाढला असून, रसवंती गृह, टरबूज, काकडी, शीतपेय विक्रीच्या दुकानावर सध्या नागरीक गर्दी करताना दिसत आहेत. उकाड्यामुळे गर्मिपासून बचाव करण्यासाठी पंखे कुलर, ए.सी. आदि उपक्रम वापरावर व्यापारी, कर्मचारी व नागरिकांचा भर असला तरी ग्रामीण भागात होत असलेल्या अघोषित लोडशेडिंगने त्यात खोडा पडत आहे. परिणामी फडक्याने हवा घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. तसेच गर्मीपासून दिलासा मिळविण्यासाठी सायंकाळी मोकळ्या वातावरणात फेरफटका मारून नागरिक बचाव करताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात याचा फटका जनावरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसत असून, लिंबाचे, चिंचेचे, आंब्याचे यासह सावलीचे मोठे झाड पाहून उन्हापासून बचाव करत आहेत. एकूणच यंदाच्या उन्हाळा गतवर्षीच्या उष्णतेचा आकडा पार करणारा ठरला असला तरी हि उष्णतेची लाट आगामी ४८ तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बाहेर उन्हाचे चटके तर घरात घामाच्या धारा
कधी – कधी अधून मधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उकाडा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. बाहेर उन्हाचे चटके तर घरात घामाच्या धारा गळू लागण्याने वरून राजा बरसला तर चांगले होईल. पाणी टंचाई आणि उकाड्यापासून दिलासा तरी मिळेल अशी रास्ता अपेक्षा नागरिक बोलून दाखवीत आहेत.