उद्यापासून शाळा सुरू होणार; राज्य सरकारने जारी केली नियमावली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व महापालिका हद्दीतील म्हणजे शहरी भागात इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू करण्यास अलीकडेच मंजुरीदेण्यात आली आहे.

ओमिक्रॉनच्या भीतीमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकावा, अशी मागणी होत असली तरी येत्या बुधवारपासून शाळा सुरू केल्या जातील, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शाळेत विलगीकरणाची सुविधा असायला हवी. तसेच शाळेच्या प्रशासनाने स्थानिक आरोग्य विभागाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे, असे या नियमावलीत सांगण्यात आले आहे. तशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

 राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली.. 

▪️ शाळा सुरू करण्यापूर्वी त्या गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.

▪️ शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.

▪️ शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची (Biometric Attendence) पद्धतीचा अवलंब करू नये.

▪️ एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत आणि शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतो किमान सहा फूट अंतर ठेवावे.

▪️ शाळेत प्रत्येकाने मास्क परिधान केलेले असावेत.

▪️ प्रत्येकाने वारंवार हात धुवावे व शाळा स्वच्छ ठेवावी.

▪️ शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना घेणं टाळावं.

▪️ ज्यांना कोरोनाची कसलीही लक्षणे असल्यास अशा व्यक्तींना शाळेच्या आवारात, वर्गात येण्यास मनाई करावी.

▪️शाळेत येणारी मुले असो वा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये, कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे.

▪️ क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची (E-Learning) सोय उपलब्ध असावी.

▪️ शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या वेळेत कोरोनाबाधित झाल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा संपूर्ण आढावा घ्यावा.

▪️ शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करून स्वच्छ ठेवावी.

▪️ शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये. यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.

▪️ एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे सोबतच विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांत दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी.

▪️ शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने हळूहळू शाळेत बोलवावे.

▪️ शहरी भागात महापालिका आयुक्त आणि इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी, नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात.

▪️ या आधीच्या टप्प्यांत ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्रासाठी आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत. त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी.

▪️ पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.