पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहवीची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. ३ मार्च ते २३ मार्च २०२० या कालावधीत ही परीक्षा होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
यंदा राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थींची वाढ आहे. तर 80 उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक आहेत.
यंदाही ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करुन दिल्याचे मंडळाने स्पष्ट केले. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके ‘गैरमार्गाशी लढा’ या नावाने काम करणार आहेत. यामध्ये महिलांचे एक विशेष पथक काम करणार आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय मंडळात हेल्पलाईन तयार करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना, पालकांना येणाऱ्या अडचणींवर या माध्यमातून 24 तास मार्गदर्शन करण्यात येईल.