मुंबई : मेट्रो कारशेडचा मुद्दा आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे येऊन थांबला आहे. कांजूरमार्गच्या केंद्राच्या मालकीच्या जागेवरून न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यामुळे आता हा प्रकल्प बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे हलविण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे.
यावरूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचा मुद्दा टीम इंडिया म्हणून हाताळायला हवा. भाजपाच्या कार्यकाळातच मेट्रो कारशेडचे ८०टक्के काम झाले आहे. मुख्यमंत्र्यांकडे संधी होती मात्र इगोमुळे मुंबईच्या हिताचा निर्णय त्यांनी घेतला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.
चुकीच्या नियोजनामुळे मेट्रो कारशेडचे प्रकरण आणखी चिघळत चालले आहे. तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर त्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन करू शकले असते. आज मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर आपले सर्व निवेदन अपूर्ण आहे आणि ते जनतेला भ्रमात पाडणारे आहेत, पण आताही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी यांना सोबत घेऊन पंतप्रधानांची आणि केंद्रातील इतर मंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढावा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.