भुसावळ : उत्तर भारतात मागच्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. दिल्लीतील थंडीने मागील जवळपास 120 वर्षांपासूनचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. दरम्यान, थंडी आणि धुक्याचे प्रमाण वाढल्याने उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांना फटका बसत आहे. यामुळे भुसावळात येताना गाड्यांना नियोजित वेळेपेक्षा विलंब होतो. परिणामी प्रवाशांना गाड्यांची प्रतीक्षा करावी लागते. संचखंड एक्स्प्रेस, गोवा, महानगरी, झेलमसह एकूण ९ गाड्या विलंबाने धावल्या.
या समस्येमुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच थांबून गाडीची वाट पहावी लागते. अारक्षण असलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. मंगळवारी विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमध्ये सचखंड एक्स्प्रेस ४ तास, गाेवा एक्स्प्रेस ८ तास, महानगरी एक्स्प्रेस २ तास, पाटलीपूत्र एक्स्प्रेस २.१५ तास, पुष्पक एक्स्प्रेस ७ तास, कनार्टक एक्स्प्रेस ६ तास, कामायनी एक्स्प्रेस २ तास, झेलम एक्स्प्रेस चार तास, तर डाऊन सचखंड एक्स्प्रेस पाच तास, या गाड्यांचा समावेश होता.