नवी दिल्ली : नववर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे प्रवास महाग झाला आहे. कारण, भारतीय रेल्वेने गाड्यांच्या तिकीट दरात वाढ केली आहे. हे नवे दर उद्यापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत. दरम्यान, उपनगरी रेल्वेला या भाडेवाढीतून वगळण्यात आले असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अन्य सर्व प्रकारच्या रेल्वे भाडय़ांमध्ये प्रति किलोमीटर एक ते चार पैसे वाढ करण्यात आली आहे.
नव्या वाढीव दरामुळे दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ होणार आहे. सर्वसामान्य बिगर एसी, बिगर उपनगरीय आणि एसी श्रेणीच्या तिकीटांमध्ये प्रति किलोमीटर चार पैसे या प्रमाणे वाढ करण्यात आली आहे. तर मेल-एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रति किलोमीटर २ पैसे अधिक मोजावे लागणार आहे. शयनयान आणि प्रथम श्रेणीच्या भाडे शुल्कात प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
शताब्दी, राजधानी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, गरीबरथ, गतिमान, जनशताब्दी, राज्य राणी, युवा एक्स्प्रेस, सुविधा, मेमू या रेल्वेगाडय़ांचा प्रवासही महाग झाला आहे. आरक्षण शुल्क, उपकर, आदींमध्ये बदल झालेला नाही. वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार वस्तू व सेवा कर बदलेल.
रेल्वेचे वाढलेलं तिकीट भाडं
सामान्य नॉन एसीचं भाडं
सेकंड क्लास ऑर्डिनरी : 1 पैसा प्रति किलोमीटर
स्लीपर क्लास ऑर्डिनरी : 1 पैसा प्रति किलोमीटर
फर्स्ट क्लास ऑर्डिनरी : 1 पैसा प्रति किलोमीटर
मेल/एक्सप्रेस नॉन एसीचं भाडं
सेकंड क्लास (मेल/एक्सप्रेस) : 2 पैसे प्रति किलोमीटर
स्लीपर क्लास (मेल/एक्सप्रेस) : 2 पैसे प्रति किलोमीटर
फर्स्ट क्लास (मेल/एक्सप्रेस) : 2 पैसे प्रति किलोमीटर
एसी क्लासचं भाडं
एसी चेयर कार : 4 पैसे प्रति किलोमीटर
एसी 3-टियर/3E : 4 पैसे प्रति किलोमीटर
एसी 2-टियर : 4 पैसे प्रति किलोमीटर
एसी फर्स्ट क्लास/इकॉनोमी क्लास/EA : 4 पैसे प्रति किलोमीटर
मात्र, उपनगरातील रेल्वे सेवा आणि सीझन टिकीट दरात काहीही बदल झालेला नाही.