भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले असून इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यल्प किमतीत दर्जेदार उपकरणांच्या निर्मितीत पाऊल टाकणार आहे. २०१० पासून देशभरात या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भुसावळच्या विद्यार्थ्यांनी नॅनोरोबोटिक्स क्षेत्रातही मुसंडी मारली आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची पाहणी करतांना केले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी तेजस कुळकर्णी, अजय हिरोळे, अरबाज शेख यांनी प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ. गिरीष कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती क्षेत्रापासून संरक्षण क्षेत्रात उपयुक्त आवाजावर नियंत्रित होईल असा “व्हाईस कंट्रोल रोबोट” बनवला आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते.
मोठ्या मोठ्या इमारतीखाली असलेले पाईप तपासणी, जीवितहानी रोखण्यासाठी बॉम्ब विल्हेवाट प्रणालीत, अनिश्चित भागात सामग्री वाहतूक करण्यासाठी वापरली जाऊ शकते त्याप्रमाणे रोबोट खूप उपयुक्त ठरू शकतो. लष्करी पाळत ठेवणे, घरातील फरशी साफ करणे, शेतात तण ओळखणे आणि ते काढून टाकणे, रोबोटिक मोर्स मार्स, चंद्र इत्यादी खगोलीय संस्थांवर संशोधन कार्य करण्यासाठी वापरला जाऊ शकतो अशी माहिती तेजस कुळकर्णी याने दिली.
रोबोसाठी लागले तीन हजार रुपये
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश अशी आहे की एक रोबोट विकसित केला आहे. वापरकर्त्याने दिलेल्या सूचनेनुसार काम करते. या प्रकल्पात मोबाइल अॅपद्वारे सूचना देऊन हालचाली नियंत्रित करता येतात. मोबाइल ब्लूटूथ एचसी -05 वापरुन रोबोटशी कनेक्ट केलेला आहे. प्रा.गजानन पाटील, प्रा.धिरज पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी हा रोबो तयार केला आहे. त्यासाठी तीन हजार रुपये एवढा खर्च आला आहे. त्यात बॅटरी बसविण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर हा रोबो तयार झाला. मोटर ड्रायव्हर, डीसी मोटर्स, ब्लुटूथ प्रणाली द्वारे रोबोट कार्य करतो अशी माहिती अरबाज शेख याने दिली.
इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रगतीमुळे रोजगाराच्या व स्वयंरोजगाराची दालने खुली:
मानवी कौशल्यांशी या रोबोटची तुलना केल्यास हे मानवांपेक्षाही सरस असल्याचे आढळून आले आहे. विद्यार्थी नेहमी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नवीनता आणण्याचा प्रयत्न करतात. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या प्रगतीमुळे नवीन रोजगाराच्या व स्वयंरोजगाराची दालने खुली झालेली आहेत असे मत डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी मांडले.