आंतरराज्य, राज्यांतर्गत वाहतुक सुरु करण्याबाबत अनिल देशमुख यांनी केलं ट्विट ; म्हणाले

0

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे.

आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यांतर्गत आणि आंतरराज्य माल आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याबाबतच्या या सूचना आहेत. आम्ही या मार्गदर्शक सूचनांची गंभीरपणे नोंद घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. देशमुख यांनी हे ट्विट केल्याने राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतूक सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी अनलॉक ३ बाबत सर्व राज्यांचं लक्ष वेधलं आहे. राज्यांनी स्थानिक पातळीवर लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वस्तू आणि सेवांची वाहतूक, पुरवठा साखळी, आर्थिक कामकाज बिघडणे आणि बेरोजगारी वाढणे असे परिणाम होत आहेत, असं केंद्राने म्हटलं आहे. आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतीही बंधने नसतील, असं केंद्राने आपल्या अनलॉकिंगच्या नियमावलीत स्पष्टपणे सांगितलं आहे. एका पत्राद्वारे अजय भल्ला यांनी याची आठवण करुन दिली. नागरिकांना प्रवासासाठी किंवा राज्याची सीमा ओंलाडून मालवाहतूक करण्यासाठी कोणतीही वेगळी परवानगी, ई-पास यांची आवश्यकता नाही, असंही केंद्राने म्हटलं आहे. राज्यांनी निर्बंध कायम ठेवले तर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गृह मंत्रालयाच्या नियमांचं हे उल्लंघन असेल, असा इशाराही केंद्राने दिलाय. कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवासी वाहतूक सुनिश्चित केली जावी, असं केंद्राने म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.