भुसावळ (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण देशात २१ दिवसा करिता लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक वस्तूच्या आस्थापना चालु राहणार आहेत. मात्र, विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संचारबंदी केली आहे, नागरिकांनी काही अडचणी किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीसाठी भुसावळ तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने प्रत्येक प्रभागात चार शिवसैनिक देण्यात येतील त्यासाठी शिवसेनेने नियोजन सुरु करण्यात आले आहे. याबाबतीत प्राथमिक माहिती तहसीलदारांना दिली असल्याचे भुसावळ शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी कळविले आहे.
अत्यावश्यक सेवा देऊन शासनाला मदत करणार-समाधान महाजन
काही अत्यावश्यक कामानिमित्त किंवा अडचण आल्यास आपल्या भागातील शिवसैनिकांशी संपर्क साधावा, आपली अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. वेळप्रसंगी अत्यावश्यक सेवा घरपोच शिवसैनिक पुरवतील, अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन समाधान महाजन यांनी केले आहे. उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व शिवसैनिकांनी नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहे.