अखेर.. रामायण एक्सप्रेसमधील वेटर्सच्या पेहरावात केला बदल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रामायण एक्स्प्रेसमधील आपल्या वेटर्सचा गणवेश रेल्वेने सोमवारी बदलला आहे. उज्जैनच्या साधूंनी वेटर्सच्या भगव्या पेहरावावर आक्षेप घेतल्यानंतर रेल्वेने हा बदल केला आहे. वेटर्सचा भगवा पोशाख हा हिंदू धर्माचा अपमान आहे, तो बदलला नाही, तर १२ डिसेंबर रोजी दिल्लीत ट्रेन रोखू, अशी धमकी साधूंनी दिली होती. त्यानंतर रेल्वेने हा बदल केला आहे.

भारतीय रेल्वेने वेटर्सच्या व्यावसायिक पोशाखात पूर्णपणे बदल केला आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व असे म्हटले आहे. नवीन बदलांतर्गत रेल्वेने वेटर्ससाठी गणवेश म्हणून सामान्य शर्ट, ट्राउझर्स आणि पारंपारिक टोपी देण्यात आली आहे. पण, वेटर्स भगवी टोपी आणि हातमोजे घालणे सुरू ठेवतील.

उज्जैन आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस अवधेशपुरी यांनी सांगितले की, आम्ही रेल्वेमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते, ज्यामध्ये आम्ही रामायण एक्स्प्रेसमध्ये अल्पोपाहार आणि जेवण देणार्‍या वेटर्सच्या भगव्या पोशाखाला विरोध केला होता. टोपीसह भगवा पोशाख घालणे आणि साधूप्रमाणे रुद्राक्ष माळ (हार) घालणे हा हिंदू धर्म आणि संतांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले होते.

भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी भारतीय रेल्वेने राम सर्किट रामायण एक्सप्रेस ट्रेन सुरू केली आहे. अयोध्येपासून ती सुरू होऊन रामेश्वरमपर्यंत जाईल. धार्मिक प्रवासाशी संबंधित या ट्रेनमध्ये ट्रेनमध्येच भाविकांना जेवण दिले जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. यामध्ये रेल्वेचे सेवा कर्मचारी साधूंची वेशभूषा करून प्रवाशांना जेवण देत होते. साधूंनी आक्षेप घेतल्यावर आयआरटीसीने तात्काळ आपल्या सेवा कर्मचार्‍यांचा पोशाख बदलला.

दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या या ट्रेनचा अयोध्या हा पहिला थांबा आहे. येथून धार्मिक यात्रा सुरू होते. अयोध्येतील प्रवाशांना नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी मार्गे रस्त्याने नेपाळला नेले जाते. यानंतर प्रवाशांना रेल्वेने भगवान शिवाची नगरी काशी येथे नेले जाते. येथून बसने सीता संहिता स्थळ, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटसह काशीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.