मुंबई : भारतीय संघाचा मधल्या फळीतला फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी जाहीर केला. अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर व्यक्त केलेली नाराजी रायुडूला भोवल्याची चर्चा आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रायुडू आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. रायुडूने २००४ मध्ये अंडर-१९ च्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषावले आहे.
रायुडूनं भारताकडून 6 ट्वेंटी-20 सामन्यांत 42 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 97 सामन्यांत 45.56 च्या सरासरीनं 6151 धावा कुटल्या आहेत आणि त्यात 16 शतकं व 34 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने 160 सामन्यांत 5103 धावा केल्या, तर सर्व प्रकारच्या 216 ट्वेंटी-20 लढतीत 4584 धावा चोपल्या आहेत. त्यात एका शतकाचाही समावेश आहे.