लोकशाही न्यूज नेटवर्क
बंगालच्या उपसागराच्या अग्नेय आणि दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा क्षेत्र आता पूर्णपणे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरीत झालं आहे. यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला. भारतीय हवामान विभागाने बुधवारी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात वातावरणात बदल होईल, त्यानंतर त्याच वादळात रूपांतरित होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील बदलामुळे वादळ पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याचा अंदाज आहे. वातावरणात बदल होऊन हळूहळू ३० नोव्हेंबर पर्यंत बंगालच्या उपसागरातील दक्षिणेच्या खोल दबाव क्षेत्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४८ तासांत नैऋत्य आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात ‘मायचॉन्ग’ चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
एका मीडिया वृत्तानुसार, विभागाने दिलेल्या माहितीनुसार निकोबार बेटांवरील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर अंदमान बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ३० नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, या चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे २५-३५ किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. हे वारे ताशी ४५ किलोमीटर प्रतितास पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.