अमळनेर
खरीप हंगाम २०२४ या वर्षी जळगाव जिल्ह्यासह अमळनेर / पारोळा तालुक्यात वरुणराजाने कृपादृष्टी केलेली असून सर्व शेतकरी बांधवांनी कापूस, मका या मुख्य पिकांसह सर्व अन्य पिकांची खरीप पेरणी ५ जून ते १४ जून पर्यंत पुर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः या पिकांचा वाढीचा कालावधी जुलै महिन्याचा असून या पिकांच्या वाढीच्या कालावधीत कापूस, मका या मुख्य पिकांसह शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मुख्य मागणी इफको १०:२६:२६ व युरीया या खतांची असून आज बाजारात याच खतांचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे.
या बाबतीत मी स्वतः काही कृषि केंद्र धारकांना विचारणा केली असता, त्यांचेकडून माहिती मिळाली की, ज्यावेळी इफको १०:२६:२६ व युरीया या खतांचा रॅक लागत असेल, त्यावेळी खत निर्मिती कंपन्यांकडून त्यांचेकडील अनावश्यक विशिष्ट मालाची सक्ती (लिंकींग) केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक खते कृषि केंद्र धारक आपल्या कृषी केंद्रापर्यंत मागवत नाही, तोपर्यंत इफको १०:२६:२६ व युरीया यासारखी शेतकऱ्यांकडून मागणी असलेली महत्वाची रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे.
सबब : या रासायनिक खतांच्या कृत्रिम टंचाईवर मात करण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रत्येक रॅकचा तालुकानिहाय समान वाटप / हिस्सा ठरवून तो हिस्सा (कोटा) त्या तालुक्यासाठीच राखून ठेवून त्याचेवाटप खत निर्मिती कंपनीकडूनच करण्यात यावे. यामध्ये कोणत्याही वितरकाचा हस्तक्षेप असू नये. कारण कंपनी वितरकाला अगोदरच अनावश्यक माल देवून टाकत आहेत.
त्यासाठी आपल्या स्तरावरूनच रासायनिक खते निर्मिती कंपन्यांनी प्रत्येक रॅकमधून सर्व तालुक्यांना आवश्यक मागणीनुसार कंपन्यांनी माल पाठविले जाणे बंधनकारक करण्याची कार्यवाही, शेतकरी बांधवांना सहज रासायनिक खते उपलब्ध होणेसाठी आदेश व्हावेत अशी पत्राद्वारे मागणी अमळनेर तालुक्याचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.