नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच जात आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 22 हजार 771 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांच्या झपाट्याने वाढत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
एकीकडे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सरकार अनलॉक 2.0 च्या माध्यमातून काही प्रमाणात सवलतीही देण्यात येत आहेत. मात्र याचा परिणाम उलट होत असल्याचे दिसून येत आहे.
देशात सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 6 लाख 48 हजार 315 झाली आहे. तर, 24 तासांत 442 जणांचा मृत्यू झाला. यासह मृतांचा एकूण आकडा 18 हजार 655 झाला आहे. देशात सध्या 2 लाख 35 हजार 433 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 3 लाख 94 हजार 227 रुग्ण निरोगी झाले आहेत.
देशात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 6364 नवीन रुग्णांची नोंद झाली. हा एक दिवसातला सर्वाधिक आकडा आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 92 हजार 990 झाला आहे. तर, 24 तासांत 198 लोकांचा मृत्यू झाला. यासह मृतांचा आकडा 8376 झाला आहे.