भुसावळ (प्रतिनिधी )- सर्वपक्षीयांनी कोरोनाच्या लढाईत एकत्र येवून लढा दया, ही वेळ राजकारणाची नाही, निवडणुका येतील तेव्हा राजकारण करु, जिव वाचला तर पक्ष वाचेल याकरीता एकजुटिने कार्य करा असे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.
भुसावळ शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून त्यावर खबरदारी व उपाययोजना म्हणून येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत असलेल्या ट्रामा केअर सेंटर आणि नवोदय विद्यालय येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बुधवार २७ मे रोजी कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे,आमदार संजय सावकारे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण व जिल्हा कोव्हिड नोडल अधिकारी व भुसावळातील इतर प्रशासकीय व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी भुसावळकरांनी घाबरून न जाता स्वतःकडे लक्ष द्यावे, शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे .भुसावळ शहर रेल्वे जंक्शन असून रेल्वे वसाहत आहे ,त्यात जाणारे येणारे लवकर समजून येत नाही यासाठी आपापल्यापरीने प्रत्येकाने काळजीपुर्वक काम करावे ,आपणच आपली काळजी घ्या, स्वतः कडे लक्ष दया, जिल्ह्यात पुढारी, प्रशासन, अधिकारी , दुर्लक्ष करतात वगैरे ताशेरे न ओढता एकजुटिने या लढयात सहभागी व्हां , शासनाला मदत करा ,ही वेळ राजकारण करण्याची नसून सर्वपक्षीयांनी या लढाईत एकत्र येवून लढा देण्याची आहे , निवडणुका येतील तेव्हा राजकारण करु , जिव वाचला तर पक्ष वाचेल असा इशारा यावेळी दिला. तसेच जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत आहे , त्याप्रमाणे बरे सुद्धा होत आहे . काळजी घ्या असेही ना.पाटिल म्हणाले.