नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज संभ्रम वाढवणारं विधान केलं आहे. शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासंदर्भात आज शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी अंतिम चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत गेलेले आहे. दरम्यान, ते दिल्लीत पोहचले असून त्यांना राज्यातील सरकार स्थापने संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना आणि भाजपलाच विचार, असं उत्तर दिलं आहे. इतक नव्हे तर सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु आहे का याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, कसली चर्चा, कोणाशी चर्चा. पवारांच्या या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या होणाऱ्या भेटीवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत. आज सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यांनी भेटीची निश्चित वेळ सांगितली नाही. या भेटीतून सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल असं वाटत असतानाच, त्यांनी संभ्रम वाढवणारं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेविषयी त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले. त्यावर याबाबत तुम्ही भाजप आणि शिवसेनेलाच विचारायला हवं, असं उत्तर त्यांनी दिलं. त्यांच्या या विधानानं पुन्हा संभ्रम वाढला आहे. तसंच सोनिया गांधी यांच्याशी होणारी भेट ही शिष्टाचाराचा भाग आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. यातून ते सोनिया गांधी यांच्या भेटीअगोदर आपले पत्ते उघड करू इच्छित नाहीत, हे स्पष्ट होत आहे.
शरद पवार आणि पत्रकारांमधील नेमका संवाद काय?
प्रश्न – सोनियांना भेटणार आहात का ?
उत्तर – हो… संध्याकाळी, सदिच्छा भेट आहे.
प्रश्न – शिवसेना तर म्हणतेय पवारांसोबत सरकार बनवू?
उत्तर – अच्छा?
प्रश्न – सर, सरकारस्थापनेला चर्चेमुळे उशीर होतोय ?
पवार – कुणाशी चर्चा? कसली चर्चा?
प्रश्न – काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेचे सरकार सत्तास्थापन करेल?
पवार – शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले, काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढले!
प्रश्न – काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना सत्तास्थापन करेल?
उत्तर – ते आमच्या लोकांना विचारावं लागेल.